महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरीता नकारात्मक गुणांच्या अंमलबजावणीसाठी (निगेटिव्ह मार्किंग) सुधारित कार्यपद्धत जाहीर करण्यात आली आहे.
यातील दोन महत्वाचे बदल म्हणजे, आता इथून पुढे परीक्षांचा निकाल अपूर्णांकात लागणार आहे व प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी आता १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत.
वस्तुनिष्ठ बहुपर्यायती परीक्षांकरीता यापूर्वी अवलंबविण्यात येत असलेल्या सर्व कार्यपद्धती अधिक्रमित करून यापुढे सर्व वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरता पुढीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे.
१. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
२.एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून कमी करण्यात येतील.
३.वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
४.एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही.